चक्रीभुंगा व उंट अळी पासून सोयाबीन सांभाळा
वर्धा, दि. 22 - सोयाबीन व कापूस या दोन महत्वाच्या पिकांवर येणा-या किड रोगाचे नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रकल्प राबविण्यात येत असून पिकांवरील किडीबाबत निरीक्षण ऑनलाईन पध्दतीने संकलीत करण्यात येवून त्यावर नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी आज दिली.
वर्धा जिल्ह्यात सुमारे 1 लाख 70 हजार 104 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, तर 1 लाख 85 हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. पिकांना आवश्यक असणारा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिकांची वाढही समाधानकारक असून, जिल्ह्यातील देवळी, कारंजा, सेलू , वर्धा , आदी तालुक्यात त उंट अळी व चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर तातडीने नियंत्रण करणे आवश्यक आहे.
पिकांवरील किड नियंत्रणासाठी जिल्ह्यात 27 स्काऊट आणि तीन किड नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली असून, प्रत्येक आठवड्यामध्ये 32 ठिकाणी पिकांच्या किडीबाबत प्रत्येक स्काऊट निरीक्षण घेऊन त्याचा अहवाल ऑनलाईन पध्दतीने बुधवार व शनीवारी कृषि विद्यापिठाला पाठविल्या जातो. प्रत्येक आठवडयात जिल्ह्यातून 864 निरीक्षणे घेतल्या जातात. त्यानुसार विद्यापिठाकडून सुचविण्यात आलेल्या किड नियंत्रणची माहिती 8 हजार शेतक-यांना एसएमएस व्दारे पाठविली जाते.
किड नियंत्रणाबाबत या आठवड्यात मिळालेल्या निरीक्षणानुसार उंट अळीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकांवर दिसुन आला असून शेतक-यांनी सतर्क राहून त्याचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. उंट अटीमुळे आर्वी तालुक्यातील कारंजा, पाचोड, सोरटा, विरुळ, देवळी तालुक्यातील अडेगाव, अंदोरी, आंजी , बोपाकूर, खर्डा, दापोरी, गणेशपूर, गौळ, गिरोली , काजळसरा, मोमीनपुरा, पाथरी , पिंपळगाव (लुटे), सोनेगाव. कारंजा तालुक्यातील धर्ती, संसधर, ठाणेगाव, सेलू तालुक्यातील आमगाव, हमदापूर, हिवरा, जंगलपूर, जोगापूर, मोर्चापूर, सेलडोह.
वर्धा तालुक्यातील बोरगाव, सावरी, दिग्रस, गणेशपूर, गोंदापूर, कारला, करंजी, कांजी, मदनी, महाका, नारायणपूर, साखरा, तरोडा, उमरी मेघे, वाठोडा, येनकापूर, झाडगाव या गावामध्ये उंट अळीचे नियंत्रण तातडीने करणे आवश्यक आहे.
असे करा नियंत्रण
सोयाबीन व कापूस पिकावरील किड नियंत्रणासाठी शेतात पक्षांना बसण्यासाठी पक्षी थांबे तयार करावेत. यावर बसणारे पक्षी शेतावर बसणा-या अळ्या टिपून खातात. तसेच प्रकाश सापळ्यांचा नियंत्रीत उपयोग करुन किडीचे पतंग नष्ट करावे. शेतामध्ये कामगंद सापळे हेक्टरी दहा सापळे लावावे.
किडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यास किटकनाशकांचा वापर करावा. यामध्ये क्विनालफॉस , क्लोरोपायरीफॉस, इमामेक्टीन बेन्झाएट, स्पीनोसॅड, थायोडीकार्ब, प्रोफेनोफॉस, बिव्हेरीया बॅसियाना चा वापर करावा.
चक्रीभुंगा या किडीसाठी डायमथोएट किंवा थेनव्हॅलरेट , प्रायजोफास्ट यापैकी एका किटकनाशनाचा प्रती 10 लिटर पाण्यात मिसळवून फवारणी करावी. पावरस्प्रे फवारणी करावयाची असल्यास किटकनाशकांची मात्रा तिप्पट करावी.
सोयाबीन पिकावरील चक्रीभुंगा ही महत्वाची किड आहे. या किडीचा मादीभुंगा पाणाच्या फांदीवर किंवा मुख्य खोडावर एकमेकापासून 1 ते दीड सें.मी. अंतरावर दोन गोल काप करुन त्यात अंडी टाकतो. त्यामुळे चक्रकापाचा वरचा भाग सुटतो. अंड्यातून निघालेली अळी पाणाचे देठ व फांदीतून आत जाते. या किडीचा प्रादुर्भाव मुंग, उडीद, बरबटी या पिकावर सुध्दा होऊ शकतो. या किडीमुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटते.
पिकावरील उंटअळी आणि चक्रीभुंगा किडीचे नियंत्रण करण्यासाठी तांत्रिक माहिती शेतक-यांनी तालुका कृषि अधिकारी अथवा मंडळ अधिकारी यांचेकडून घ्यावी. व शेताततील पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना करावीत, असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहे ब-हाटे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment